Ad will apear here
Next
बळवंतराव मोरेश्वरराव...


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्मदिन तिथीने नागपंचमीला असतो, तर त्यांची जन्मतारीख २९ जुलै. त्या निमित्ताने, प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचा हा लेख... 
.........
पुण्यातील रेणुका स्वरूप शाळेच्या पटांगणात मुंगीलाही शिरायला जागा नसेल अशी गर्दी. दिवस थंडीचे. नाही... नाही... मी ‘सवाई गंधर्व’ महोत्सवाबद्दल बोलत नाहीये. तो कार्यक्रम होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदात्त, उत्कट आणि उत्तुंग जीवन कथेचा - शिवचरित्राचा. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती ज्या शिवचरित्राने शब्दशः भारून जाते ते चरित्र त्याच्याच निर्मात्याच्या तोंडून ऐकायला प्रत्येक जण रोज उपस्थिती लावत होता. जिवाचे कान करून चरित्रात समरस होत होता.

त्या दिवशी तर ‘पन्हाळ्याच्या लढाईचा’ प्रसंग रंगणार होता. गर्दीमध्ये आठवीतला एक मुलगा होता. त्याने शिवशाहीरांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकातील त्या प्रसंगाच्या चित्रावरून तसेच एक चित्र काढून आणले होते. त्या मुलाला त्याच्यावर व्याख्यानकर्त्याची स्वाक्षरी हवी होती. दीड तास चाललेल्या कथनातून सर्व वातावरण शिवमय होऊन गेले होते. जणू उपस्थितांतील प्रत्येक जणच पन्हाळ्याच्या लढाईत सहभागी झाला होता. कार्यक्रम संपला. व्याख्यात्यांभोवती गर्दी जमली. तो मुलगाही त्या गर्दीतून त्याने काढलेले चित्र जपत, वाट काढत घाईने पुढे गेला. व्याख्यात्यांच्या प्रमाणेच त्यानेही काळी शेरवानी ‘पेहेनली’ होती. त्याच्या छोट्याशा मूर्तीकडे जेव्हा व्याख्यात्यांचे लक्ष गेले तेव्हा त्यांच्याही चेहऱ्यावर हसू उमटले. त्यांनी मुलाला पुढे बोलावले. तो पुढे झाला आणि त्याने स्वाक्षरीसाठी ते चित्र त्यांच्या पुढ्यात धरले. त्याच्या हातातील चित्रावर ओळी लिहिल्या होत्या, ‘हा भास? नव्हे इतिहास... घेतला घास पन्हाळ्याचा’. चित्र पाहून व्याख्याते खूष झाले. त्यांनी त्या चित्राच्या पाठीमागे संदेश लिहिला, ‘वा... छान. खूप मोठे चित्रकार व्हा!’ मग मोडी लिपीत स्वाक्षरी केली - ‘बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे.’ मुलाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्या भरात त्याने सांगितले, की माझ्या आजोळचे आडनावही पुरंदरे आहे. त्यावर व्याख्यात्यांनी मुलाच्या पाठीवर शाबासकी देत ते म्हणाले, ‘अरे, मग भाचे की तुम्ही आमचे.’ शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांना मी आयुष्यात पहिल्यांदा भेटलो तो हा प्रसंग. समोरची व्यक्ती कितीही लहान असली, तरी ते ‘अहो-जाहो’ करतात. आज हा प्रसंग घडून ४४ वर्षे होऊन गेली. तपस्वी व्यक्तींचे आशीर्वाद वाया जात नाहीत. त्यांच्या संदेशात थोडा बदल होत मी प्रकाशचित्रकार मात्र झालो. आणि माझ्या भाग्याने मला नंतर असंख्य वेळा त्यांना भेटण्याची संधीही मिळाली.

थीम कॅलेंडरच्या माझ्या प्रकल्पातील २००५ सालचे कॅलेंडर होते ‘दिग्गज.’ वेगवेगळ्या क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वांची मी टिपलेली प्रकाशचित्रे त्यात वापरली होती. त्यात मला श्रीमंत बाबासाहेबांचे प्रकाशचित्र वापरावयाचे होते. माझ्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे मी त्या सर्वांना परवानगी विचारणारी पत्रे पाठविली. दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आदरणीय बाबासाहेबांना फोन केला त्याच वेळी मी त्यांनी ‘फोटोसेशन’साठी वेळ देण्याची विनंतीही केली. त्या वर्षी दिवाळी सहा दिवस होती. बाबासाहेब सुदैवाने पुण्यातच होते. मी विचारल्यावर क्षणात त्यांनी मला शनिवार, १३ नोव्हेंबर २००४ रोजी संध्याकाळी चार वाजता येण्यास सांगितले. त्यांचा वक्तशीरपणा मला ठाऊक असल्याने मी पर्वती येथील त्यांच्या ‘पुरंदरे वाड्यावर’ दहा मिनिटे आधीच पोहोचलो. तळमजल्यावरील मोठ्या हॉलमध्ये मोठमोठे हंडे, भिंतीवर ढाल-तलवारी, एक-दोन मोठी पेंटिंग्ज, चौरंग, जरीकाम असलेले पडदे असा सगळा ‘दरबारी’ थाट होता. बरोब्बर चार वाजता बाबासाहेब पायजमा, गडद रंगाचा सिल्कचा झब्बा, त्यावर त्यापेक्षा गडद असे जाकीट, सोनेरी काडीचा चष्मा आणि डोक्यावर फरची टोपी या वेशात त्या हॉलमध्ये आले. त्यांची चपळता पाहून त्यांचे वय त्या वेळी ८२ वर्षे आहे असे कोणाला वाटलेही नसते. दरवाज्यातून आत येणारा ‘सॉफ्ट’ असा प्रकाश ज्या सोफ्यावर पडला होता, त्या ठिकाणी बसण्याची विनंती मी त्यांना केली. त्यांच्या स्वभावात असलेली मृदुता त्या सौम्य अशा प्रकाशात जास्तच दृग्गोचर होत होती. असा छान उपलब्ध प्रकाश मिळाल्यावर ‘फोटोसेशन’ला वेळ तो कितीसा लागणार? त्यांच्या चेहऱ्यावरील भावही बदलत होते. कोठेही कृत्रिमतेचा लवलेश नव्हता. होती ती अपार सहजता आणि एखाद्या लहान मुलाची निरागसता. स्वाभाविकच ती त्यांच्या प्रकाशचित्रातून उजळून आली. माझं काम अवघ्या वीस मिनिटांत झालं होतं. कॅलेंडरमध्ये त्या प्रकाशचित्राखाली अजित सोमण सरांनी ओळी लिहिल्या - ‘शिवरायांचा प्रताप, विवेक आणि साक्षेप अखिल भूमंडळी पोहोचविण्यासाठी वाणी आणि लेखणीचा हिलाल चेतवणारे : ‘शिवमय झाले अवघे जीवन.’ किती यथार्थ वर्णन.

नंतरही वेळोवेळी बाबासाहेबांकडे अनेक वेळा जाण्याचा योग आला. प्रत्येक वेळी मला त्यांच्या माझ्यावरच्या प्रेमाचा अनुभव येत गेला. २८ सप्टेंबर २०१३ ते तीन ऑक्टोबर २०१३ या दरम्यान मी पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात माझ्या तीस वर्षांतील विविध कामांच्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन भरवले होते. हातातील व्यावसायिक कामे, प्रदर्शनाची गडबड आणि उपलब्ध असलेला कमी वेळ यामुळे मी माझा लहान भाऊ हरीश याच्यावर निमंत्रणे देण्याची कामगिरी सोपविली. त्याप्रमाणे वेळ घेऊन तो बाबासाहेबांच्या घरी गेला. त्यांनी निमंत्रण पत्रिकेच्या संरचनेचेही तोंड भरून कौतुक केले. ‘मी प्रदर्शनास नक्की येईन असे सतीशरावांना सांगा,’ असा निरोप त्यांनी हरीशजवळ दिला.

दोन ऑक्टोबर २०१३. आता प्रदर्शनाचा एकच दिवस राहिला. म्हणून मी माझ्याकडे असलेल्या बाबासाहेबांच्या नंबरवर फोन केला. बाबासाहेब तेथे नव्हते. फोन त्यांचे सहायक प्रतापराव टिपरे यांनी घेतला. त्यांनी मला विचारले, की ‘बाबासाहेबांनी येतो असे सांगितले आहे का?’ मी उत्तर दिले, ‘हो. त्यांनी माझ्या भावाजवळ तसा निरोप दिला आहे.’ यावर प्रतापराव म्हणाले, ‘ बाबासाहेबांनी येतो सांगितले आहे ना, मग ते येणारच. निश्चिंत रहा.’

तीन ऑक्टोबर २०१३. प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस. सकाळपासूनच बरीच गर्दी होती. मी सकाळी ११च्या सुमारास परत फोन केला. या वेळी प्रताप्ररावांना. ते म्हणाले, ‘आम्ही सकाळी सात वाजता मुंबईला जायला निघालोय. एक काम उरकून संध्याकाळपर्यंत पुण्यात येणार. घरी जाताना बालगंधर्व कलादालनात जाऊ असे बाबासाहेब म्हणाले आहेत.’ संध्याकाळचे साडेसहा होत आले म्हणून मी परत एकदा प्रताप्ररावांना फोन केला. त्या वेळी त्यांनी खुलासा केला, ‘बाबासाहेबांचे एक घनिष्ठ मित्र अचानक वारले आहेत. आम्ही परस्पर वैकुंठात आलोय. आता घरी जाऊन अंघोळ करून मग आम्ही प्रदर्शनाला येणार आहोत.’ साडेसात वाजता कलादालनाच्या पोर्चमध्ये बाबासाहेबांची इनोव्हा थांबली. मी पळत खाली आलो. त्यांना नमस्कार केला. कठड्याला धरून ते वर आले. दिवसभराच्या प्रवासाने आणि नंतर घनिष्ठ मित्राला द्याव्या लागलेल्या निरोपाने ते थोडेसे थकलेले होते. कलादालनात एक ‘एक्झिक्युटिव्ह’ खुर्ची होती. त्यावर ते बसले. त्या खुर्चीला चाकं होती. पंधरा मिनिटांनी मी त्यांना म्हणालो, ‘बाबासाहेब, तुम्ही खुर्चीतच बसा. मी ती खुर्ची ढकलत नेतो. त्यामुळे तुम्हाला बसूनच प्रदर्शन पाहता येईल.’ माझं बोलणं झटकून टाकत ते म्हणाले, ‘ नाही, मी चालत-चालतच प्रदर्शन बघीन’ आणि उठून निघालेही. प्रतापरावांच्या खांद्यावर एक हात ठेवून संपूर्ण प्रदर्शन त्यांनी सुमारे पाऊण तास घालवून बारकाईने पाहिले. औद्योगिक व जाहिरातींसाठी काढलेल्या प्रकाशचित्रांतील बारकावे जाणून घेतले. ‘सेल-ओ-ग्राफी’ या मी नव्याने निर्माण केलेल्या प्रकाशचित्रांचं मनापासून कौतुक केलं. एक एक पॅनल पाहत आम्ही शेवटी असलेल्या गायक-वादकांच्या फोटो- पॅनलपाशी पोहोचलो. त्यात एक फोटो होता पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा. त्या फोटोपाशी आल्यावर त्यांच्या तोंडून एकदम दाद आली, ‘अरे वा... सतीशराव, काय सुंदर भावमुद्रा पकडलीय तुम्ही आमच्या बाळासाहेबांची ! असं वाटतंय, की बाळासाहेबांचे स्वरच आता ऐकू येतील. फार छान!’ त्यांच्या या अभिप्रायाने माझं मन मोहरून गेलं. मग ते परत थोडा वेळ बसले. त्यांना सोडायला मी त्यांच्याबरोबर परत पोर्चमध्ये आलो. गाडीत बसल्यावर ते मला म्हणाले, ‘सतीशराव, माझं एक काम आहे तुमच्याकडे.’ मी काय म्हणून विचारल्यावर म्हणाले, ‘मी तुम्हाला सहा तारखेला सकाळी नऊ वाजता फोन करतो.’ मी ‘बरं’ म्हणालो. प्रदर्शनाची सांगता मोठी समाधानकारक झाल्याने मी खूश होतो.

बाबासाहेबांनी सांगितलेली वेळ मी दोनच दिवसांत विसरून गेलो; पण ते विसरले नाहीत. तीनच दिवसांनी म्हणजे सहा तारखेला बुधवारी सकाळी बरोबर नऊ वाजता माझा मोबाइल वाजला. पलीकडे स्वतः बाबासाहेब बोलत होते. त्यांनी मला विचारले, की शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता मी त्यांच्या घरी येऊ शकेन का? माझे उत्तर अर्थातच ‘हो’ असे होते. मग अगदी लक्षात ठेवून मी शुक्रवारी बरोबर पावणेचारला त्यांच्याकडे पोहोचलो. बाबासाहेब कोणत्या तरी मीटिंगसाठी एक वाजताच बाहेर गेलेले होते. ते यायचे होते. तेथे त्यांचे एक पुत्रवत सहायक श्री. गणेशराव ढालपे हजर होते. बाबासाहेबांनी चारची वेळ दिली आहे, हे कळल्यावर त्यांनी बाबासाहेबांना फोन केला. मीटिंग लांबली होती. ते यायला अजून एक तास लागणार होता. मग माझ्या गणेशरावांबरोबर गप्पा सुरू झाल्या. आणि बाबासाहेबांच्या सहवासात असलेली ही व्यक्ती किती अभ्यासू आणि तयारीची आहे याचा मला साक्षात्कार होत गेला.

पाच वाजता बाबासाहेब आले. वेळ सांगून काही कारणामुळे ती पाळता आली नाही याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मीच ओशाळून गेलो. त्यांनी थेट मला काय काम आहे हे सांगायला सुरुवात केली.

‘शिवचरित्रात अशा अनेक घटना आहेत, अनेक गुणी माणसं आहेत, की ज्यांची इतिहासाने नोंद घेतलेली नाही. अशा व्यक्तींच्या गोष्टी आपण फोटोग्राफीच्या आधारे, प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन चित्रीकरण करून, खरे हत्ती, घोडे, शस्त्रे वापरून करू या. अनेक फोटोंमधून ती कथा रसिकांपुढे उलगडत जायला हवी...’

अशी सुरुवात करून बाबासाहेबांनी शिवकाळात पुण्याजवळ बांधल्या गेलेल्या एका धरणाची, त्या वेळी घडलेल्या प्रसंगाची, महाराजांच्या एकनिष्ठ आणि दूरदृष्टी असलेल्या सहकाऱ्यांची, आपल्या राजावर निरतिशय प्रेम करणाऱ्या एका युवकाची एक कथा मला त्यांच्या नाट्यमय शैलीत ऐकवली. कथा सांगणारे बाबासाहेब आणि ऐकणारा एकटा श्रोता मी. जणू त्यांच्या कथनाने सोळाव्या शतकातील तो काळ जसाचा तसा त्या दिवाणखान्यात जिवंत होऊन पुन्हा आला आहे. कथा संपली. एवढी सुंदर कथा सांगून झाल्यावरही ते म्हणाले, ‘मी आता एकदा नीट टिपणं काढतो याची. मग आपण त्यावर काम करू.’ वयाच्या फक्त ९१व्या वर्षी आपल्या कामात अचूकता यावी यासाठी इतका विचार करणारी व्यक्ती विरळाच. त्यांच्या या वयातीलही व्यग्र अशा दिनक्रमामुळे म्हणा किंवा माझं नशीब अजून कच्चं म्हणा, ती कथा अजून प्रत्यक्षात टिपली गेलेली नाही; पण मला खात्री आहे की ती आज ना उद्या नक्कीच चित्रित होईल.

उद्या २९ जुलै २०२०.... शिवशाहीर ९९व्या वर्षात पदार्पण करतील. त्यांच्या या जन्मदिनी आपण सगळे मिळून असा निर्धार करू शकतो, की आळस, अज्ञान व अनास्था झटकून ‘डोळसपणे शिवचरित्राचे आचरण’ हाच आपला धर्म असेल. ज्यायोगे आदरणीय बाबासाहेबांना अपेक्षित असलेला विवेकी आचार-विचारांचा उषःकाल होईल.
लेखनसीमा...

- सतीश पाकणीकर
संपर्क : ९८२३० ३०३२०
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EXVACO
Similar Posts
गृहिणी-सखी-सचिव (उत्तरार्ध) परत ते फोटो पाहताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी आश्चर्याने दंग झालो आणि सुनीताबाईंपुढे नतमस्तकही! मी त्यांचे ‘सोयरे-सकळ’च्या प्रकाशनात १९९८ साली फोटो टिपले होते. बरोबर दहा वर्षांनी पुरस्काराच्या वेळी त्यांनी परत तीच जांभळी फुले असलेली साडी नेसली होती. माणसाचा साधेपणा, व्यवस्थितपणा, किती असावा, त्याच्या
अभिनयाचं विद्यापीठ प्रख्यात अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचा स्मृतिदिन १७ डिसेंबर रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने, प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेला हा लेख...
‘संतूर-नायक’ माझं मन तेहतीस वर्षं मागं गेलं. सवाई गंधर्व महोत्सव सुरू होता. मी अन् माझा कॅमेरा दोघेही ग्रीनरूममध्ये पोहोचलेलो. काहीच वेळात मी ज्यांना बघण्यासाठी तेथे आलो होतो ते पंडित शिवकुमार शर्मा तेथे पोहोचले. सहा फुटांच्या आसपास उंची. त्यांच्या काश्मिरी गोरेपणाला शोभून दिसणारा गर्द निळा झब्बा व पायजमा, लक्षात येतील इतके कुरळे केस आणि तलवार कट मिशी
गृहिणी-सखी-सचिव (पूर्वार्ध) सुनीताबाईंचा नेटकेपणा, त्यांची सौंदर्यदृष्टी ही नेहमी अनुभवास येत असेच; पण माझ्या कायमच लक्षात राहील तो त्यांचा कोणत्याही गोष्टीतील अचूकतेचा ध्यास.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language